एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी घेतला गोविंद मिल्क सोबत लाईव्ह प्रोजेक्टचा अनुभव
उरुळी कांचन
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट(मिटकॉम) च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच गोविंद मिल्कच्या प्रकल्पाला भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी लाईव्ह प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला. मिटकॉमच्या ऍग्री आणि फूड बिझिनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरात असलेल्या गोविंद मिल्क सह लाइव्ह प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांनी शहरातील एक हजाराहून अधिक किरकोळ विक्रेत्यांच्या मुलाखती घेतल्या. या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश्य हा दुग्ध व्यवसायातील संधी आणि आव्हाने जाणून घेणे होता.
यावेळी एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, गोविंद मिल्कचे श्री अक्षय शिंदे, डॉ. अजीम शेख, डॉ. प्रीती टिळेकर सुरकुटवार आदी उपस्थित होते.
उरुळी कांचन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विवेक पाटील यांची निवड
उरुळी कांचन
येथील विवेक पुरुषोत्तम पाटील यांची उरुळी कांचन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरची निवड उरुळी कांचन शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रामभाऊ तुपे यांनी केली.
याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष बाळकृष्ण काकडे, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस प्रसाद कांचन, उद्योजक योगेश कांचन, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुरकुटे, विकी चव्हाण आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी निश्चितच यशस्वीपणे पार पाडणार सर्वांना बरोबर घेऊन असे शहर उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी सांगितले.
पेरणे- वढु खुर्द येथील ‘शीवरस्ता’चं झालायं ‘गायब
हवेली तालुक्यातील पेरणे -वढु खुर्द या दोन गावांंच्या सिमाहद्दीवरील शीवरस्ताचं अतिक्रमण होऊन गायब झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.रस्ताचं गायब (अतिक्रमणीत )झाल्याने परिसरात राहणाऱ्या व या रस्त्यावर येणे-जाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या नागरिकांची व शेतकरी बांधवांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
महसूल नकाशानुसार ३३ फूट रुंद असणाऱ्या या शीव रस्त्यालगत अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी,विकसकांनी शेतजमीनीत प्लॉट करुन त्या प्लॉटची विक्री केली आहे.पुढे त्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आलेली आहेत.त्याचबरोबर काही शेतकरी बांधवांनी रस्त्यावरचं शेती करुन वहिवाट वाढवली आहे.
त्यामुळे नकाशावर असणारा शीवरस्ताचं गायब करण्यात आला आहे कि काय?असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे.
नकाशातील शासकीय रस्त्यावर अतिक्रमण होऊ न देणे,अतिक्रमण करण्याचा प्रयत्न कोणी करत असल्यास त्या अतिक्रमण धारकांस नोटीस पाठवणे,त्यावर महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे हि जबाबदारी स्थानिक महसूल सजा तलाठी,मंडलाधिकारी व त्यानंतर तहसीलदार यांची असते.
गेले ७ – ८ वर्षापासून अतिक्रमणीत झालेला शीवरस्ता सार्वजनिक वापरासाठी खुला करण्याबाबत काही स्थानिक सजग नागरिक तालुका महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी अर्ज,विनंत्या करत होते.त्यानंतर अ.भा.ग्राहक पंचायत,हवेली तालुक्याच्यावतीने हि जवळपास तीन वेळा लेखी पत्रव्यवहार,स्मरणसंदेश करण्यात आला होता. यानंतरही स्थानिक प्रशासन टोलवाटोलवी पलीकडे कोणतीही योग्य भूमिका घेत नसल्याने अखेर अखिल भारतीय ग्राहक पंचायत,हवेली तालुका यांच्या माध्यमातून सरकारी नकाशावरील शीव रस्ता कायदेशीर कार्यवाही करून कायमस्वरूपी सार्वजनिक वापरासाठी खुला करण्याबाबत विभागीय आयुक्त,पुणे विभाग व जिल्हाधिकारी,पुणे यांना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले आहे.
योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन लवकरात लवकर पेरणे- वढु खुर्द शीवरस्ता खुला करण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन प्रशासनाच्यावतीने हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी यावेळी दिले आहे.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत,हवेली अध्यक्ष संदीप शिवरकर, उपाध्यक्ष विठ्ठल ठोंबरे,संघटक गणेश सातव,सचिव कैलास भोरडे,स्थानिक नागरिक जीवन सुकाळे हे उपस्थित होते.
सावंत प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार राहुल शिंदे व ह.भ.प आंनद तांबे महाराज यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
उरुळी कांचन
कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुलजी शिंदे तसेच अध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे वृद्ध कलावंत साहित्यिक मानधन समिती पुणे जिल्हा सदस्य, सल्लागार समिती सदस्य, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ पिंपरी चिंचवड महानगरपालिका चिंचवड देवस्थानचे ट्रस्ट विश्वस्त ह. भ. प. श्री.आनंद तांबे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सावंत प्रतिष्ठानच्या वतीने गेली पंचवीस वर्षांपासून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराचे वितरण आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय जगताप यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साहित्यिक, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य संजय सावंत यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. दरवर्षी न चुकता या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. निस्वार्थी भावनेने समाजातील मान्यवरांचा गौरव केला जातो हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरस्कारार्थी राहून शिंदे व हभप आनंद तांबे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत, सदस्य डॉ सुमित काकडे, काँग्रेस राज्यकार्यकरिणीचे पदाधिकारी गणेश जगताप, माजी सरपंच संभाजी काळाने, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार, राष्ट्रीय खेळाडू माणिक पवार, नंदकुमार कामठे, विलास उंदरे, लक्ष्मण साळुंखे आदी उपस्थित होते.
थेऊर- अंगारकी चतुर्थीच्या निमित्त व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
उरुळी कांचन
अंगारकी चतुर्थीच्या निमित्त व्हिलेजर्स फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिरावेळी मोठ्या उत्साहात गणेश भक्तांनी आपला सहभाग नोंदविला. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प.आनंद महाराज तांबे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी व्हिलेजर्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजेश काळभोर सर, तर्पण ब्लड बँकेचे डॉ.प्रविण नवले सर व इतर मान्यवर उपस्थित होते. तर्पण ब्लड बँक, विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये ६० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या वेळी व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. ईश्वर सेवेला मानव सेवेची झालर देणाऱ्या व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात
राजपूर (ता.आंबेगाव) येथे केंद्रातील नऊ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पाडला.यावेळी अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या बालकांचे सेल्फी काढून स्वागत व फेटा बांधून,फुगे,चॉकलेट,गुलाबाची फुले देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पुरुष व महिलांच्या लेझीम पथकाने,ढोल,ताशाच्या निनादात व बालकांनी ‘ताई माई आई आक्का-विद्यार्थ्यांचा पाया करा पक्का’, ‘मेळावा कशासाठी-विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी,’ ‘शाळापूर्व तयारी असे आमची शान-विद्यार्थी करू हुशार आणि छान’ अशा संदेशफलकासह प्रभातफेरी काढली.त्यानंतर सरस्वती पूजन सरपंच कमल लोहकरे व मेळाव्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देहू कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर लोहकरे,पोलीस पाटील उत्तमराव वाघमारे,सुभाष भोते,निवृत्ती गवारी,माजी सैनिक जिजाराम भोईर, केंद्रप्रमुख चिमा बेंढारी,ग्रामसेवक उल्हास कारभळ,माजी मुख्याध्यापक काळू लोहकरे,खंडू उंडे,हनिफ इनामदार, ग्रामपंचायत सदस्य बारकू उंडे,अंगणवाडी सेविका,विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
मेळाव्यात तळेघर,फलोदे, कोंढवळ, गवांदेवाडी, निगडाळे, म्हतारबाचीवाडी,राजपूर,पालखेवाडी,सावरली शाळांतील दाखलपात्र बेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी मुलांची नावनोंदणी करून प्रत्येकाचा शारीरिक, बौध्दिक, सामाजिक, भावनिक व भाषा विकास,गणनपूर्व तयारीबाबत प्रात्याक्षिकांद्वारे क्षमतांची चाचपणी करण्यात आली.पालकांची शाळापूर्व तयारीमध्ये भूमिका काय आहे,यावर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांना विकासपत्रक तसेच कृतीपुस्तिका देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून अंगणवाड्या बंद असल्याने बालकांना शाळा पूर्वतयारी कृतीची संधी मिळाली नाही.त्यामुळे बालकांची अपेक्षित शाळा पूर्वतयारी व्हावी व त्याआधारे दाखलपात्र बालकांचे पहिलीच्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे याकरिता ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याचे संयोजन मुख्याध्यापक सावळेराम आढारी,गोविंद उतळे,अनिल वाव्हळ,पांडुरंग भवारी,संतोष थोरात,राजू भालेराव,उषा गवारी,रतन सुक्रे,वृषाली बोऱ्हाडे,नयना चौधरी,अलका गुंजाळ,सुनंदा काळे,तुकाराम डामसे,वामन गभाले,किरणराज शेंगाळे,मनोहर थोरात,काळूराम भांगरे,बाळासाहेब गेंगजे यांनी केले.प्रास्ताविक संजय हुले व आभार मनोहर केंगले यांनी मानले.
ओझरच्या विघ्नहराचे अंगारकी चतुर्थीला लाखो भाविकांनी घेतले दर्शन
नारायणगाव : किरण वाजगे