मारहाण करुन लुटमार करणारे दोन सराईत अट्टल चोरटे जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

केडगाव चौफुला नजीकच्या वाखारी ( ता. दौंड ) येथे मारहाण करुन लुटमार करणाऱ्या दोन सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी ( वय २९, रा.केडगाव, पिसेवस्ती, ता. दौंड) व अमोल उर्फ लखन विलास देशमुख ( वय २९, रा. खंडोबानगर, ता. बारामती ) याला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवार ( ११ मार्च ) रोजी दुपारी २ -३० वाजण्याच्या सुमारांस केडगाव चौफुला जवळील वाखारी गांवचे हद्दीत कॅनॉलचे कच्चे रोडचे कडेला सागर सुर्यवंशी व एका अनोळखी इसमाने रमेश शामजी कुछाडीया ( वय ३६, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई ) यांचे गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन, उजवे मनगटावरील दोन तोळा वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, दोन सोन्याच्या अंगठया, एक मोबाईल, रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकुण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून चोरुन नेला. त्यावेळी कुछडीया यांनी आरडाओरड केला असता तेथे रस्त्याने जाणारे लोक आल्याने दोघे आरोपी पळून गेले होते. याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन यवत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाच्या असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड हे पथक पुणे – सोलापूर महामार्गावर कुरकुंभ परिसरात करत असताना त्यांना गोपनीय खबऱ्यामार्फत दोन इसम हे पाटस, बारामती फाटा ता.दौड येथे त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी येणार आहेत. अशी बातमी मिळालने लागलीच पथकाने वेशांतर करुन त्या ठिकाणी सापळा रचला

तेथे सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी दुचाकीवर येवून उभ्या असलेल्या सागर सुर्यवंशी व लखन देशमुख या दोन संशयितांना हेरले. परंतू हे पूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोलीसांना पाहून ते पळून जात असताना पोलीसांनी त्यांच्याकडील वाहन त्यांच्या दुचाकीला आडवे लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे वाखारी येथील जबरी चोरीचे गुन्हयातील त्यांनी चोरलेल्या २ सोन्याच्या अंगठया, १ मोबाईल, रोख रक्कम ७ हजार रुपये तसेच गुन्हयात वापरलेली दुचाकी व इतर १ मोबाइल असा एकूण १ लाख २ हजार रुपयेचा ऐवज मिळून आलेने तो जप्त केलेला आहे. प्राथमिक चौकशी मध्ये दोघे आरोपींनी सदरचा ऐवज वाखरी येथे एका इसमास मारहाण करून जबरदस्तीने लुटल्याचे सांगितले.

हे दोघे यापूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून आरोपी सागर सुर्यवंशी याचेवर यापूर्वी यवत व भिगवण पोलीस स्टेशनला ३ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर अमोल देशमुख याचेवर यापूर्वी पुणे, सोलापूर व सातारा जिल्हयात जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, दुखापत, चोऱ्या असे एकूण २२ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी केडगाव चौफुला, पाटस, कुरकुंभ, सोलापूर रोड येथे वाहनचालक व प्रवासी यांची लुटमार केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू असून यामुळे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर परिसरात अशा प्रकारे कोणाची जबरदस्तीने लूटमार झाली असल्यास यवत पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन घनवट यांनी केले आहे. जप्त केलेला मुद्देमाल व दोघे आरोपी यांना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

Previous articleवाडेबोल्हाई गावच्या वेशीवर कचरा टाकणाऱ्याला २५ हजाराचा दंड
Next articleश्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधीतून अंध व अपंगांना धनादेशाचे वाटप