पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि ‘रस्ते सुरक्षा पॅट्रॉल (आर.एस.पी) पुणे यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

रस्त्यावर होणारे अपघात व त्यामुळे होणारे मृत्यू किंवा कायमस्वरूपी येणारे अपंगत्व आणि त्याचा कुटुंब व समाजावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच रस्ता वाहतुकीचे नियम, संबंधित कायदे व नागरिकांनी घ्यावयाची सुरक्षा या विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते .

“ भारतात होणारे एकूण अपघाताची आकडेवारी पाहता, महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो, तर पुणे शहराचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आहे, ही परिस्थिती बदलावयाची असल्यास जनजागृती खूप महत्वाची आहे. या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आर.एस.पी. प्रमुख श्रीमती हरिभक्त पी.एन यांनी मार्गदर्शनात केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. आर.के. अडसूळ यांनी सांगितले की “आपण सर्वांनी रस्ते वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे तरच सर्व लोक सुरक्षितपणे प्रवास करू शकतील. रस्ते अपघात टाळणे त्याचबरोबर अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करणे हेदेखील महत्वाचे आहे, त्यासाठी सर्वांनी प्रशिक्षण घ्यायला पाहिजे.”
या कार्यक्रमात रस्ते सुरक्षे संबंधी शपथ घेण्यात आली.” आम्ही रस्ते वाहतुकीचे सर्व नियम पाळू, हेल्मेटचा नियमित वापर करू, शिटबेल्टचा नियमित वापर करू, व्यसन करून वाहन चालविणार नाही, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेऊ, अपघातग्रस्ताना मदत करू, व एक सुज्ञ नागरिक बनू “ अशी शपथ सर्वांनी घेतली.या प्रसंगी “ सडक सुरक्षा जीवन रक्षा ” ही संकल्पना विचारात घेऊन महाविद्यालयामध्ये भित्तीपत्रिका स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन आर एस पी च्या विभागीय समादेशक श्रीमती हरिभक्त पी.एन. यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक देशपांडे क्षमा अविनाश, द्वितीय क्रमांक म्हस्के मंगेश सुनील, तृतीय क्रमांक- माकर दिक्षा दत्तात्रय, तर उत्तेजनार्थ बैरागी प्रीती पोपट व कुंभार ओमकार संजय यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्रा. पिंजारी डी.आर. यांनी तर आभार प्रा. गायकवाड एस. जे. यांनी मानले. आणि सूत्रसंचालन कुमारी कोमल काळे यांनी केले.

या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अडाले एल.बी., राष्ट्रीय सेवा समिती सदस्य प्रा. बोत्रे ए. पी, प्रा. शिंदे ए, एस,, शारीरिक संचालक प्रा.डॉ. परदेसी एच.एस. , प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. कानकाटे व्ही. एन, कार्यालय अधिक्षक श्री राजपूत पी. टी. राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले.

Previous articleॲड.दिलीप गिरमकर यांची शिरुर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
Next articleघोडेगाव परीसरामध्ये शिवजयंती साजरी