यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याची आमदार अशोक पवार यांची सहकारमंत्र्यांकडे मागणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर – हवेली तालुक्यातील लोकप्रतिनिधी कसा असावा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारे अभ्यासक नेतृत्व आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून नागरिकांना पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय असो किंवा पूर्व हवेली भागातून नव्याने जाणारा रिंगरोड असो आमदार अशोक पवार यांनी नेहमी स्पष्टपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहे.

हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी कर्ज असलेल्या विविध वित्तीय संस्थाचे अधिकारी, सहकारी खात्याचे वरिष्ठ अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करुन कारखाना चालू करण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देताना आमदार पवार म्हणाले, पूर्व हवेलीमधील हजारो उस उत्पादक शेतकऱ्यांच्या रोजीरोटीशी निगडीत असलेला कारखाना गेले ११ वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचनींचा सामना करावा लागत आहे. कारखाना चालु करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भात मागील वर्षभरापासुन प्रयत्न सुरु होते. मात्र कोरोनामुळे सहकारमंत्री बाळासाहेब पाटीलयांच्यासमवेत कारखान्यावर कर्ज असलेल्या विविध वित्तीय संस्थाचे अधिकारी, सहकारी खात्याचे वरीष्ठ अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्याने, पुढील काही दिवसात वरील घटकांची बैठक बोलविण्यासंदर्भात मागणी केलेली आहे. यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही होकार दिला आहे.

सन २०१४ मध्ये यशवंतचा संचित तोटा १३८२४.७८ लाख तर नक्त मुल्य ऊणे ८८१६.९७ लाख होते. त्यामुळे त्यावेळीच कारखान्याची बाहेरील कर्जाची मर्यादा संपुष्टांत आली आहे. त्यानंतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. व सन २०११ पासून आजअखेर कारखाना बंद अवस्थेत आहे. या दहा वर्षाच्या कालावधींत कारखाना चालू करण्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतू त्यात यश आले नाही. त्यामुळे कारखान्याचे कामकाज आर्थिक व प्रशासकीय अडचणींमुळे ठप्प झाले आहे. सहकार कायदा, नियम व पोटनियम यांतील तरतुदीनुसार कारखाना चालू होण्यांस असमर्थतता निदर्शनात आल्याने कारखाना अवसायनात घेणेबाबत प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) यांनी २०१४ मध्ये निर्णय घेतला. त्यामुळे यशवंतची अवस्था जैसे थे आहे.

यासंदर्भात बोलताना आमदार पवार पुढे म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोलवडीसह पुर्व हवेलीत हजारो एकर उसाची लागवड केली जाते. मात्र कारखाना बंद असल्याने, शेतकऱ्यांना कमी दरात उस द्यावा लागत आहे. यामुळे कारखाना लवकरात लवकर सुरु होण्याची गरज आहे. राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास, कारखाना सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

Previous articleसभागृह नेते प्रकाश धारीवाल कार्यकर्त्यांना ताकद देणारे तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे- नगरसेवक अभिजीत पाचर्णे
Next articleमाहिती सेवा समितीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी येथे पार पडली माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळा