भावी पिढीला प्रेरणादायी असे स्मारक कोरेगाव भिमा येथे उभारावे :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

पुणे

कोरेगाव भिमा येथे शौर्याचे प्रतिक म्हणून मोठी वास्तू उभी करायची आहे. भावी पिढीला प्रेरणा मिळावी असे सुंदर स्मारक येथे उभारण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरेगाव भिमा येथील स्मारकाच्या विकासकामांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

श्री.मुंडे म्हणाले, शासनाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. जागेची अडचण दूर झाल्यानंतर या कामाला वेग देता येईल. त्यामुळे कायदेशीर बाबींसाठी तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात यावे. विविध देशात पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून अशी स्मारके उभारुन त्यांचे जतन करण्यात येते. त्याच धर्तीवर सुंदर आणि त्या काळातील स्मृतींना उजाळा देणारे स्मारक उभारावे. या परिसरात कायमस्वरुपी वाहनतळ, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृह आदी कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्याचा विचार व्हावा. स्मारकाच्या आराखड्यासाठी संकल्पना स्पर्धा घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांनी यावेळी सांगितले.

दुर्गम भागातील ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करावी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

ऊसतोडणी मजुरांचे सहा महिने ऊस तोडणीत जातात. त्यांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये सर्व कामगारांची नोंदणी ऑनलाईन करता येणार नाही. त्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. त्यांच्या कामाच्या जागेवर नोंदणी करून नंतर साखर कारखान्यांच्या मदतीने ऑनलाईन माहिती भरावी तसेच कारखाना आणि ग्रामसेवकांकडून या माहितीची खात्री करुन घ्यावी, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.

श्री.मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे राहील आणि बीड परिसरात ऊसतोडणी कामगारांची अधिक संख्या लक्षात घेता उपकार्यालय बीड येथे असणे आवश्यक आहे. मुख्य कार्यालयासाठी इमारत तयार होईपर्यंत शिवाजी नगर येथील खाजगी जागेत कार्यालय सुरू करावे. महामंडळाचे कामकाज त्वरीत सुरू करून मजुरांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल असे श्री.मुंडे यावेळी म्हणाले.

ऊसतोडणीचे काम मजुरांकडून केल्यानंतर साखरेचा उतारा अधिक मिळतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कारखाना आणि मजुरांचे संबंध साखर उत्पादन असेपर्यंत कायम राहणार आहे. या मजुरांची दिनचर्या लक्षात घेता त्यांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना सुविधा देण्यासोबतच महामंडळाने ऊसतोडणी कामगारांचे श्रम कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. साखर आयुक्त आणि महामंडळाच्या समन्वयाने साखर कारखान्यांची कार्यशाळा आयोजित करुन नोंदणी प्रकियेबाबत माहिती संबंधित कामगारांना देण्याचे सांगितले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऊसतोड कामगारांची नोंदणी ॲपद्वारे करताना आवश्यक बदलाबाबत सूचना केल्या. या कामासाठी साखर कारखान्यांचे सहकार्य घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजासाठी 3 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ऊस तोडणी कामगारांचा अपघात विमा, फिरत्या रुग्णालयासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सर्व साखर कारखान्यांना एक समन्वयक अधिकारी नेमण्याची सूचना साखर आयुक्तांमार्फत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ.नारनवरे यांनी यावेळी दिली. या बैठकीनंतर समाज कल्याण आयुक्त यांच्या नवीन इमारतीबाबत आढावा घेण्यात आला. उपलब्ध जागेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करुन आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. शक्य असेल तेथे अस्तित्वात असलेल्या इमारतीवर अतिरिक्त मजल्यांचे बांधकाम करावे, अशा सूचना श्री.मुंडे यांनी यावेळी दिल्या.

कोविडमुळे स्थगित राहिलेले ‘संत रविदास पुरस्कार ‘ या वर्षी घोषीत करणार

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय ‘संत रविदास पुरस्कार’ कोविड मुळे गेली दोन वर्षे स्थगित होता. या पुरस्कारांची या वर्षी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथील कार्यक्रमात दिली. संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री.मुंडे यांनी शिवशंभूनगर, कात्रज, पुणे येथील गुरू रविदास महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त उमेश सोनवणे, अखिल भारतीय रविदाशिया धर्म संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, रतनलालजी सोनाग्रा आदी उपस्थित होते. कार्यक्रमात संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना विविध पुरस्कार वितरीत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले. तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रत्येक समाज घटकाला समान वागणूक मिळावी. जाती-पातीच्या भिंती कोसळून एकमेकांप्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा, या महान विचारसरणीचा संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार आणि प्रसार करुन देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोहचवले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत राज्यातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती श्री.मुंडे यांनी यावेळी दिली. तसेच महामंडळाचे भागभांडवल यावर्षी पासून वाढविण्यात येणार असून, याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचीही यावेळी त्यांनी माहिती दिली.

Previous articleपुर्वाताई वळसे पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्ज वाटप
Next articleसराईत गुन्हेगार संकेत गायकवाड २ वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार