राज्यात २०२१ मध्ये कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये कौशल्य विकास विभागामार्फत २.१९ लाख जणांना रोजगार; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

अमोल भोसले,पुणे

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये २०२१ या वर्षामध्ये २ लाख १९ हजार १५६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात ४५ हजार १८२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. डिसेंबर २०२१ मध्ये विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद आणि यश मिळाले. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९३ हजार ८७१ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

मुंबईत डिसेंबरमध्ये ७ हजार ३१४ बेरोजगारांना रोजगार

डिसेंबर २०२१ मध्ये विभागाकडे ६९ हजार ५२ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ३४८, नाशिक विभागात १० हजार ८८९, पुणे विभागात १३ हजार ५३९, औरंगाबाद विभागात सर्वाधिक १८ हजार ३५७, अमरावती विभागात ११ हजार ६५८ तर नागपूर विभागात ३ हजार २६१ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ४५ हजार १८२ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ७ हजार ३१४, नाशिक विभागात ७ हजार ५७०, पुणे विभागात ५ हजार ९३१, औरंगाबाद विभागात सर्वाधिक १४ हजार ७३, अमरावती विभागात ९ हजार ४०० तर नागपूर विभागात ८९४ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

त्याचबरोबर वर्ष २०२१ मध्ये विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांमधून २ लाख १९ हजार १५६ जणांना रोजगार मिळाला. यामध्ये मुंबई विभागात ८० हजार ६७०, नाशिक विभागात ३१ हजार ६०७, पुणे विभागात ६२ हजार ४०३, औरंगाबाद विभागात २८ हजार २, अमरावती विभागात १२ हजार २० तर नागपूर विभागात ४ हजार ४५४ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

Previous articleप्रधानमंत्री पीक योजना समितीच्या सदस्यपदी नंदकुमार चौधरी यांची निवड
Next articleदारूच्या दुकानाचा व्यवसाय सुरू होऊ नये म्हणून आखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे यवत पोलीस स्टेशनला निवेदन