शेतकऱ्यांना पाच लाखांचे कर्ज शून्य टक्के दराने : देशात पुणे जिल्हा बँकेची आघाडी

योगेश राऊत, पाटस

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाणार आहे. हा निर्णय बॅंकेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.येत्या रब्बी हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

कर्ज पुरवठ्याच्या या प्रस्तावाला सहकार विभागाची मान्यता घेऊन अंमलजबावणी करण्यात येणार आहे. पाच लाख रूपये शून्य टक्के व्याजाने देणारी पुणे जिल्हा बँक देशातील एकमेव बँक ठरणार आहे. तीन लाखांहून अधिक आणि पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीन लाखांपुढील रकमेचे म्हणजे उर्वरित दोन लाख रुपयांचे व्याज जिल्हा बॅक भरणार आहे.

गेल्या बारा वर्षांपासून पुणे व सातारा या दोन जिल्हा बॅंका शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात येत आहे. या दोन्ही बॅंकांचा शून्य टक्के व्याजाचा हा पॅटर्न राज्यभर चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून घेतला आहे. राज्य सरकारने या निर्णयाची चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून अंमलबजावणी सुरु केली आहे.यामुळे चालू वर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात आले आहे.

बॅंकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे या सभेला ऑनलाइन उपस्थित होते.

जिल्हा बॅक ही शेतकऱ्यांची बॅक आहे. या बॅंकेचा खरा मालक हा शेतकरी आहे. शून्य टक्के पीक कर्ज वाटपाची मर्यादा वाढवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यांची मागणी पूर्ण करणे हे बॅंकेचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य आज पार पाडले आहे. यामुळे अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, असे बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

Previous articleकुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत
Next articleआमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारला जातोय जगातील सर्वांत उंच स्वराज ध्वज