पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालया मार्फत उरुळी कांचन मध्ये लम्पी आजारा विषयी जनजागृती

उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील शास्त्र शाखा व नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लम्पी आजार विषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे.

या अभियाना अंतर्गत लम्पी आजारा विषयी माहिती शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना दिली जात आहे. तसेच या विद्यार्थ्यांमार्फत उरुळी कांचन परिसरातील शेतक-यांचा सर्व्हे करून या शेतक-यांना लम्पी आजारावरील उपाययोजनांची माहिती दिली जात आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय येथे ‘पशुधनाचे आरोग्य व लम्पी आजाराविषयी उपाययोजना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

व्याख्यानामध्ये डॉ. कदम एच. डी., फार्म व्यवस्थापक, बायफ, उरुळी कांचन यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा साठ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. डॉ. कदम यांनी पशुधनांमध्ये होणाऱ्या लम्पी आजाराची लक्षणे जसे की, ताप येणे, तोंडातून व नाकातून पाणी गळणे, खाद्यसेवनात घट, दुग्ध उत्पादनात घट याविषयी माहिती दिली. तसेच आजारावरील व्यवस्थापनात – स्वच्छता ठेवणे, वारंवार तपासणी करणे, लसीकरण, विविध औषधांचा वापर करणे याबद्दल मार्गदर्शन केले. लम्पी आजारास भिऊन जाण्याचे कारण नाही मात्र लसीकरण, विलगीकरण, योग्य वेळी औषधोपचार हे उपाय सर्व पशुपालकानी केले पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. पशुधन हे शेतकऱ्याची तसेच संपूर्ण देशाचीही संपत्ती आहे तिची काळजी आपण घेतली पाहिजे असे ही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत यांनी पशुधन संवर्धन करा तसेच समस्यांवर मार्ग काढण्याची क्षमता व मानसिकता ठेवून सुरक्षिततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करा असे सांगितले. तरुणांचे मन तरुण असले पाहिजे आणि आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता असली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

याप्रसंगी या अभियानाचे संयोजक उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर व नॅक समन्वयक प्रा. नंदकिशोर मेटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. अनुजा झाटे यांनी केले.

प्रा. प्रणिता फडके यांनी आभार मानले. तसेच प्रा.स्वाती मासाळकर, प्रा.विदया लाळगे, प्रा.प्रतीक्षा कोद्रे, प्रा.रोहिणी शिंदे, प्रा.दिपाली चौधरी, प्रा.विजय कानकाटे, प्रदीप राजपूत, मोरेश्वर बागडे, विशाल महाडिक, सीमा विसनगरकर हे प्राध्यापक व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

Previous articleशिक्षणसंस्थांमुळे बहुजनांची मुले अधिकारी झाली आहे तरीही त्यांच्या विचारांवर शिक्षण संस्थांनी चालणे गरजेचे आहे : सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे
Next article गार (बेटवाडीच्या) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी भुजबळ यांची बिनविरोध निवड