तंटामुक्ती अध्यक्षच झाला तडीपार

नारायणगाव ( विशेष प्रतिनिधी) :

सध्या सुरु असलेला गणेशोत्सव सुरळीतपणे व शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील १४ जणांना नऊ दिवसांसाठी जुन्नर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे फर्मान नारायणगाव पोलिसांनी संबंधितांना बजावले आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

 

दरम्यान या तडीपार चौदा गुन्हेगारांमध्ये चक्क (बोरी ता. जुन्नर ) येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष रोहन अनिल बेल्हेकर हा असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी दिलेल्या तडीपार आदेशानुसार नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सनी रमेश तलवार, अक्षय रमेश तलवार ( दोघेही राहणार पेठ आळी, नारायणगाव ता. जुन्नर ), अजय उर्फ सोन्या राठोड ( राहणार चौदा नंबर, कांदळी वडगाव ता.जुन्नर), आवेश आदम आतार, आकाश भाऊ गोफणे( दोघेही राहणार नानूपाटे नगर, नारायणगाव ता. जुन्नर ), सलमान अब्दुल रहमान मलिक , साहिल रफिक मुलानी( दोघेही राहणार पाटे-खैरे मळा, नारायणगाव, ता. जुन्नर ), सुशिल उर्फ बाळा राजु शिंदे, कृष्णा प्रताप माने ,सुरज बाळासाहेब चव्हाण , मोसिन फिरोज इनामदार, (सर्व राहणार इंदिरानगर नारायणगाव , ता. जुन्नर), गुरमीत बलवीर सिंग( राहणार कोल्हेमळा नारायणगाव , ता. जुन्नर ), रोहन अनिल बेल्हेकर (राहणार बेल्हेकरमळा, ता.जुन्नर), सुजित उर्फ गणपत संजय गाडेकर, (रा.नारायणगाव,ता.जुन्नर)
या आरोपींना आज( ता.२) सकाळी आठ वाजल्यापासून ते ९ ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जुन्नर तालुक्यातुन तडीपार करण्यात आले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या चौदा आरोपींना जुन्नर तालुक्यातून तडीपार करावे असा प्रस्ताव नारायणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे यांना पाठवण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या प्रवेश करण्याच्या मनाई आदेशानुसार संबंधित चौदा आरोपींना आज सकाळ पासून गणेशोत्सव काळात पुढिल नऊ दिवस तडीपार करण्यात आले आहे. हे आरोपी तडीपार कालावधीत तालुक्यात आढळुन आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

Previous articleभारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रवींद्र हिमते यांची निवड
Next articleलंडनमध्ये श्री गणरायाची दहा वर्षापासून होतेय स्थापना