बारामती मध्ये पर्यावरण परिषदेचे आयोजन; प्रत्येकाने पर्यावरणासाठी वेळ काढण्याचे सुनेत्रा पवार यांचे आवाहन

उरुळी कांचन

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया (Environmental Forum Of India), बारामती आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती मध्ये पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुनेत्रा पवार, रोकडे सर, ऍड. निलिमा गुजर, पर्यावरण मंडळाचे सल्लागार अजित, अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव मनश्री मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेच सर्व प्रथम बारामती आयकॉन पुरस्काराने गौरवार्थींचं अभिनंदन यावेळी करण्यात आलं. निसर्गाशी एकरु होऊन जगुया अशी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. याच संकल्पनेला अनुसरूनच एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीमध्ये कार्य करतेय.

देशातील पहिलं पर्यावरणपुरक गाव (Eco village) काटेवाडी या गावाचं कौतुक करण्यात आलं. शिवाय तंत्रज्ञानाच्या युगात फसलेल्यांची नाळ मातीशी पुन्हा एकदा जोडली जावी यासाठी मातीतल्या खेळांची जत्रा आयोजीत केली गेली होती. कोरोनाच्या काळात फोरम तर्फे अनेक विविध विषयांवर वेबिनार्सचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं कौतुक निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आलं होतं. शिवाय एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचा सन्मान देखील करण्यात आला. शिवाय त्यांना ग्रंथभेटही देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या विभागाअंतर्गत दिला जाणारा स्वच्छ शहराचा पुरस्कारात तिसरा क्रमांक बारामतीला देण्यात आला.

यानंतर एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. तसेच विविध मान्यवरांनी देखील पर्यावरणावर आपले विचार मांडले.

यावेळी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी देखील आपले विचार मांडले. ते मांडताना त्यांनी या परिषदेत राज्यभरातून आलेल्या पर्यावरणप्रेमींचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी बारामतीला पर्यावरणपुरक बनवण्यासाठी मा. शरद पवार आणि मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. पवार साहेब कोणतंही कार्य करताना पुढील ५० वर्षांची दुरदृष्टी ठेऊन काम करतात असं त्या म्हणाल्या. शिवाय बारामतीत जे काही कार्य झालं आहे ते पवार साहेब आणि अजित दादांनी केलं असुन आपण फक्त हातभार लावण्याचं कार्य करत असल्याचं म्हटलं आहे.

उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी, “प्रत्येकाने काम करत असताना स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. कारण पर्यावरण जगलं तरच आपण जगणार आहोत”, असं म्हटलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही वेळात वेळ काढून उपस्थिती लावली आणि अनेक महत्वाच्या गोष्टी उपस्थितांना सांगितल्या.

देवराई प्रकल्पासंदर्भात देखील फोरम विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय परिषदेत सहभागी व्यक्तींना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले व परिषदेची सांगता झाली.

Previous articleटिळेकरवाडी येथे खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांना कृषी अधिकांऱ्यानी केले मार्गदर्शन
Next articleखेड सेझ प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न लागला मार्गी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला अखेर यश