मराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन म्हसवड शहरामध्ये थाटामाटात संपन्न

अमोल भोसले,पुणे

मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे सातारा जिल्ह्यात म्हसवड शहरामध्ये राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन नुकतेच थाटामाटात पार पडले. या संमेलनाचे उद्घघाटन दीप प्रज्वलित करून राजरत्न आंबेडकर यांनी केले. मावळते अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव यांनी संमेलनाची सर्व सूत्रे संमेलनाध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे सोपविली.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे माजी राज्यपाल, व थोर विचारवंत, समाजसेवक आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सूत्रे स्वीकारीत आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, अशी संमेलन खेडोपाडी, गावोगावी भरवली गेली पाहिजेत व शोषितांना आणि वंचितांना विचारमंच उपलब्ध झाला पाहिजे. तसा विचारमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे , सरचिटणीस ज्येष्ठ लेखिका नीलिमा जोशी आणि विश्वस्त ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित, ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, ज्येष्ठ गजलकार निलाताई वाघमारे आणि हेमंत म्हात्रे या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले.

बाबासाहेबांच्या विविध पैलूंचे दर्शन राजरत्न आंबेडकर यांनी कुटुंबातील एक सदस्य या नात्याने उलगडून दाखविले व संस्थेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख पाहुणे या नात्याने माजी न्यायाधीश रावसाहेब झोडगे यांनी पूर्वीच्या प्रस्थापितांवर चुकीचा इतिहास लिहून ठेवल्याबद्दल प्रखर टीकेची झोड उठवली. इथल्या व्यवस्थेने वर्षानुवर्षे गुलामीत ठेवलेल्या गुलामीच्या शृंखला तोडून टाकाव्यात व प्रस्थापितांनी लिहून ठेवलेला चुकीचा इतिहास बदलून टाकण्याचे आवाहन आताच्या साहित्यिकांना केले. स्वागताध्यक्ष ऍड.गौतम सरतापे यांनी सर्व मान्यवरांचे शाल व ग्रंथभेट देऊन स्वागत केले तर मुख्य आयोजक म्हसवड शहराचे अध्यक्ष महादेव सरतापे यांनी सर्वांचे आभार मानले. दुपारच्या सत्रात परिसंवाद झाला परिसंवादाचा विषय होता. बोकाळलेला मनुवाद या परिसंवादाचे अध्यक्ष अकोल्याचे प्राध्यापक मोहन काळे, प्रमुख पाहुणे धुळे येथील सुनंदा निकम, पुणे येथील शुभदा कोकीळ आणि डॉ सुनीता धर्मराव, तुळजापूरचे भैरवनाथ कानडे यांनी आपले परखड विचार व्यक्त केले आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली.
त्यानंतरच्या झालेल्या कविसंमेलनाच्या सत्रात अध्यक्षा कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित आणि पाहुण्या पुणे येथील डॉ. नीता बोडखे, अकोल्याचे विलास ठोसर आदी कवींनी कविता कशी जन्मास येते, फुलते आणि बहरते यावर विचार मांडून उपस्थित रसिक प्रेक्षकांची आणि कवीची दाद मिळवली. या कवी संमेलनामध्ये सातारच्या हेमा जाधव, स्वप्नाली बर्गे, बारामतीचे युवराज खलाटे, पुणे येथील साहेबराव पवळे, कराडचे उद्धव पाटील प्रा दिलीपकुमार मोहिते, सोलापूरचे शिंदे यांच्या कवितांनी रसिक प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली, स्वतः कवी गोलघुमट यांनी आपली गाजलेली “गुलाम”ही कविता सादर करून वातावरणात नेहमीप्रमाणे खळबळ उडवून दिली.

मराठी साहित्य मंडळ तर्फे राज्यातून आलेल्या साडेतीनशे प्रस्तावांपैकी फक्त दहा ते बारा मान्यवरांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये स्नेहल आवळेगावकर, वंदना कांबळे, कराडच्या विजया पाटील, मीना पगारे, नामदेव भोसले, सुरेश येवले, प्रवीण मोरे, कल्याणचे मिलिंद पाटील, सचिन नवगण, महेश लोखंडे, चंद्रपूरच्या भावना खोब्रागडे, राजाराम पवार, जळगावच्या पुष्पां साळवे यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

तसेच साहित्य वर्तुळातील लेखकांना साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यामध्ये सोलापूरचे डॉ. शिवाजी शिंदे, मुंबईचे डॉ. शुभांगी गादेगावकर, वाशीमच्या राणी मोरे, कल्याणचे किरण हिंगोणेकर, दहिवडीच्या दयाराणी खरात, पुणे येथील साहेबराव पवळे, मनोहर सोनवणे, अनिरुद्ध पवार, आशिष निनगूरकर, आनंदा साळवे, हबिबशा भंडारे, किरण हिंगोणेकर आदी मान्यवरांचा विशेष उल्लेख करता येईल.

सकाळी ७ वाजता महात्मा फुले चौकातून निघालेल्या दिंडीचे उद्घाटन म्हसवडच्या उपनगराध्यक्ष सविताताई म्हेत्रे आणि विरोधी पक्ष नेते काझी यांनी केले होते.

म्हसवड शहरातून फिरून आलेल्या दिंडीचे स्वागत उपस्थित मान्यवरांनी संमेलन स्थळी केले. दिंडीमधील पालखीमध्ये संविधान व बाबासाहेबांची वाचनीय पुस्तके होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मराठी साहित्य मंडळाचे म्हसवड शहर अध्यक्ष महादेव सरतापे यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यक्रमाचे दिलखुलास निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका अनघा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव सरतापे यांनी केले. या सम्मेलनाला राज्यभरामधून लेखक कवी व साहित्य रसिक प्रेमींनी तसेच म्हसवड वासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. हे विशेष होय, एकूणच हे तिसरे राज्यस्तरीय संमेलन उत्साहात पार पडले.

Previous articleश्रीकृष्ण मंदिरात एक हजार पाचशे एक दिवे लावून दिपोत्सव साजरा
Next articleबकोरीच्या डोंगरावर निसर्ग सेवा करणाऱ्या ‘मोती’ श्वानाला देण्यात आला अखेरचा निरोप