भरदार पिकअपची दोन मोटार सायकलला जोरदार धडक ; पाच जणांचा अपघातात मृत्यू

नारायणगाव : (किरण वाजगे)

कल्याण नगर महामार्गांवर असणाऱ्या आळे (ता.जुन्नर)परिसरातील लवणवाडी शिवारात दि.२७ रोजी रात्रीच्या वेळी भरधाव वेगात असणाऱ्या पिकअप जीपने दोन दुचाकींसह ८ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे.

यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात दुचाकीवरून जाणारे प्रवाशी हे शेतमजूर होते. हे सर्व शेतमजूर नारायणगाव येथून शेतातील कामे आटोपून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे परतीच्या मार्गाने जात होते. या दरम्यान नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली.

या अपघातात चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन जाणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुकले, दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.मृतांमध्ये सुंदराबाई मधे (वय २८ वर्षे), गौरव मधे (वय ५ वर्षे), नितीन मधे (वय २५ वर्षे) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर अर्चना मधे आणि सुहास मधे असे गंभीर जखमी असलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.

Previous articleकीर्ती घाटगे हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
Next articleकर्णबधिर मुलांसाठी कोक्लिया संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण