नारायणगाव- किरण वाजगे
गुळुंचवाडी,आणे (ता.जुन्नर) येथील ठाकर वस्तीवरील धोंडिबा कोतवाल यांच्या १२ शेळ्यांचा बुधवार (दि.१) रोजी आलेल्या पावसाने वीज पडून मृत्यू झाला आहे.
धोंडिबा कोतवाल व त्यांची पत्नी कमल कोतवाल हे सकाळी दहा वाजता शेळ्या चारण्यासाठी आणे शिवारात गेले होते.
धोंडिबा कोतवाल शेळ्या चारत असताना दुपारी तीन नंतर अचानक मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली, पाऊस यायला लागला म्हणून शेळ्यांनी निवाऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतला आणि नेमका त्याच झाडावर विज पडली आणि त्यात धोंडिबा कोतवाल यांच्या आठ आणि शिवाजी कोतवाल यांच्या चार अशा एकूण बारा शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल यांना पण विजेच्या झटक्याचा मुका मार लागला.
कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. आणि त्यांच्यावरच असे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे प्रशासनाने ताबडतोब त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल भांबेरे व संतोष आग्रे यांनी केली आहे.