महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले…वेल डन महाराष्ट्र ! – जयंत पाटील

मुंबई – प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले… वेल डन महाराष्ट्र!.. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना सोमवारी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात एकाच दिवशी ५ हजार ७१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे समाधान व्यक्त करत याचे श्रेय राज्यातील जनतेला तसेच अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाला दिले आहे.
जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा आरोग्य विभागाची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर ट्वीट केले. एकाच दिवशी ५ हजार ७१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. ४ हजार २४२ रुग्ण मुंबई शहर व उपनगरातील आहेत. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फक्त आणि फक्त राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झाले आहे असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याने दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Previous articleराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
Next articleकुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने १२१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप