१८ आणि १९ डिसेंबर रोजी उरुळी कांचन येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन : एस.एम.देशमुख

गणेश सातव, वाघोली

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी काल उरुळी कांचन येथे झालेल्या एका बैठकीत केली.दर दोन वर्षांनी होणारे पत्रकारांचे हे अधिवेशन ऑगस्टमध्येच होणं अपेक्षित होतं,मात्र उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळं अधिवेशन लांबणीवर गेले होते.अधिवेशनास देशभरातुन दोन हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला.त्यादृष्टीने तयारी केली जाणार आहे .

 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची सर्वात जुनी आणि एकमेव संघटना आहे.दिल्ली, गोवा,बेळगाव सह राज्यातील ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेचा शाखा विस्तार झालेला असून जवळपास नऊ हजार पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत.दर दोन वर्षांनी होणारे हे अधिवेशन यापुर्वी रोहा,औरंगाबाद,शेगाव, पिंपरी-चिंचवड,नांदेड आदि ठिकाणी संपन्न झाले होते.उरुळी कांचन सारख्या ग्रामपंचायत क्षेत्रात प्रथमच हे अधिवेशन होत आहे.काल एस.एम.देशमुख, परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी नियोजित अधिवेशनाच्या जागेची पाहणी केली.

दोन वर्षांपुर्वी नांदेड येथे झालेल्या पत्रकारांच्या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकाराच्या हस्तेच व्हावे अशी भूमिका परिषदेने घेतली. त्यानुसार नांदेड अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते करण्यात आले होतेे.यावर्षी देखील एका ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकाराच्या हस्ते अधिवेशनाचे उद्धघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील मान्यवर नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

दोन दिवस पार पडणाऱ्या अधिवेशनात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. चर्चासत्र,परिसंवाद,आदि कार्यक्रमाबरोबरच ‘आप की आदालत’ पध्दतीवर आधारित एका वरिष्ठ पत्रकाराच्या मुलाखतीचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे.’डिजिटल माध्यमांचा’ प्रभाव बघता प्रिंट मिडियाला काही भवितव्य उरले आहे काय? या महत्वाच्या विषयावर देखील अधिवेशनात विचारमंथन होईल.पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि हवेली तालुका मराठी पत्रकार संघ हे या अधिवेशनाचे आयोजक आहेत.अधिवेशनास येणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विषयक सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. दोन कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेल्या पत्रकारांनाच अधिवेशनात प्रवेश दिला जाईल.तसेच अधिवेशनात सोशल डिस्टंन्सिन, सॅनिटाईझर वापर, शारीरिक तापमान तपासणी बरोबरच आरोग्य पथक देखील तैनात करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीस स्थानिक संयोजन समितीचे पदाधिकारी सुनील जगताप,जनार्दन दांडगे, एम.जी.शेलार, बापुसाहेब काळभोर, गणेश सातव, तुळशीराम घुसाळकर, शहाजी नगरे, जयदिप जाधव, सुखदेव भोरडे, जितेंद्र आव्हाळे, विजय काळभोर, अमोल भोसले, सचिन माथेफोड,महत्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य बी.के. दिवेकर, उपप्रमुख बी.आर. भोसले आदि उपस्थित होते.

राज्यातील पत्रकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या अधिवेशनास पत्रकारांनी सर्व नियमांचे पालन करित मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन, महिला संघटक जान्हवी पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, संयोजन समितीचे सुनील जगताप,जनार्दन दांडगे, बापुसाहेब काळभोर,गणेश सातव,तुळशिराम घुसाळकर,शहाजी नगरे,जयदिप जाधव, सुखदेव भोरडे,जितेंद्र आव्हाळे,अमोल भोसले,प्रा.सचिन माथेफोड,विजय काळभोर,धनराज साळुंखे आदिंनी केले आहे.

Previous articleअवसरीत मांडूळाला जिवदान
Next articleमाणसातला परमेश्वर म्हणजेच आमच्या माऊली सुनेत्रावहिनी पवार