शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोठे यांचे आवाहन

अमोल भोसले,उरुळी कांचन

नैसर्गिक आपत्ती, कीड व विविध रोगांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोठे यांनी केले आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोठे यांनी दिली. या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्याला विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ राबविण्यात येत आहे .

 हंगामासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२१ असुन आहे. योजनेची उद्दीष्टये पुढील प्रमाणे आहेत. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतक-यांना नाविण्यपुर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखीमीपासुन शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल. सदरची योजना ही अधीसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे.

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी खातेदाराचे व्यतिरीक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असुन शेतक-यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. शेतक-यांनी सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत- १५ जुलै २०२१ आहे. या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान. पिक पेरणीपासुन काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ, चक्रीवादळ, पुर क्षेत्र जलमय होणे, भुस्सखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान. नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान. पुणे जिल्हयाकरीता योजनेमध्ये भात, ज्वारी, नाचणी, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कांदा या पिकांचा समावेश आहे.

या विमा योजनेसाठी शेतक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राष्ट्रीयकृत बॅंकेची शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, मंडल कृषी आधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleपाटस येथे १५ लाखाचा अवैध वाळूचा साठा जप्त; पुणे ग्रामीण LCB पथकाची कारवाई
Next articleआज आम्ही आंदोलन करायला नाहीतर प्रशासनाला इशारा देण्यासाठी आलोय